कपाट आवरताना एक जुनं पुस्तक हातात आलं
न् बघ ना
केव्हाचा गुंतलोय मी त्याच्यात,
ती कोपर्याकोपर्यांत दुमडलेली,
केशरबदामी रंगाची पानं,
काही केल्या उलटलीच जात नाहीयेत,
त्यांनी अजुनही जपल्या आहेत त्या खुणा,
मोजक्याच ओळींखाली ओढलेल्या रेघोट्या,
आताशा पुन्ह्यांदा प्रेमात पडलोय मी त्यांच्या,
एकेक पुस्तकं म्हणजे आत्तराची कुपी असते,
माहितय ?
मी टिपतोय अत्तर थेंबाथेंबात,
पण इतक्यात भरेल ते माझं मन कुठलं,
ती तरी कधी कमी पडतात,
पुस्तकं हजारदा जरी हुंगली तरी संपतात का कुठं,
त्यांचा प्रत्येकदा आलेला गंध,
त्यांचा प्रत्येकदा झालेला स्पर्श,
नव्याने येणार्या श्रावणासारखा असतो,
आपल्याला फक्त अनुभवता आलं पाहीजे,
पुस्तकं फक्त वाचायची नसतात गं,
ती जगायची असतात,
ती जपायची असतात मनाच्या टाळाबंद पेठार्यात
अविरत.......
-अनिकेत केसरे.